राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटीचे पॅकेज!

मुंबई : दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्तांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत हे पॅकेज जाहीर केले . मंत्रिमंडळाची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत जाहीर केली.

ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात खरडून गेली त्यांना हेक्टरी तीन लाख 47 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. राज्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हीच मागणी केली याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली असून सर्वांनाच मदत होईल असे प्रयत्न सरकारचे या पॅकेजमध्ये दिसून आले आहेत .शेतकरी, नुकसानग्रस्त घरे ,जमिनी आणि जनावरांच्या नुकसानीसाठीही भरीव मदत देण्याचा शासनाचा निर्णय आहे .शेतकरी रब्बीचे पीक घेणार आहे की नाही हे विचारात न घेता सरकारने दहा हजार रुपयांची मदत करत बळीराजाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी फोन केला असून विम्या संदर्भात बैठक घेत तातडीने योग्य मदत दिली पाहिजे ,यासाठी सरकार दबाव आणेल असे सांगितले ,असे फडणवीस म्हणाले .
सरकारची आर्थिक अडचण असली तरी आर्थिक ताण सहन करून शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे ताण सहन करावा लागेल असे त्यांनी सांगितले .शेतकऱ्यांना तात्काळ पैसे देणे सुरू करणार आहे .राज्यात अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर इतक्या जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. साधारणपणे जास्तीत जास्त नुकसान 29 जिल्ह्यात झाले असून 253 तालुके सरसकट या पॅकेजमध्ये घेतले आहेत . मराठवाड्यातील परभणी ,वाशिम, जालना ,यवतमाळ या जिल्ह्यात 50 टक्क्याहून अधिक नुकसान झाले आहे .संभाजीनगर मध्ये ७५ टक्क्याहून अधिक तर सोलापूर धाराशिव मध्ये 80 टक्के हून अधिकच नुकसान झाले आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली .
जवळपास 18 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे क्रॉप कन्फेशन मधून सरकार देत आहे. आम्ही खर्चावर नियंत्रण ठेवून मदत करत आहोत ,तसेच मुख्यमंत्री सहायता निधी मधून आम्हाला पैसे मिळत आहेत असे फडणवीस म्हणाले. मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे .त्यानुसार जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 47 हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी तीन लाख नरेगाच्या माध्यमातून देण्यात येईल .त्यामुळे जवळपास हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जनावरे आणि घरासाठी ही मदत निधी
दुधाळ जनावरांना 37 हजार, गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30 हजार, कुक्कुटपालनाला प्रति कोंबडी शंभर रुपये ,नष्ट ,पडझड झालेली घरे नव्याने बांधण्यासाठी मदत, डोंगरी भागातील घरांना दहा हजाराची अधिकची मदत, झोपड्यांची मदत ,गोठा ,दुकानदार यांना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी करणार आहोत .
पीक नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये ,हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी सत्तावीस हजार रुपये ,बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी 32 हजार रुपये, विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये ,कोरडवाहू शेतकऱ्यांना 35000 ,बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना पन्नास हजाराहून अधिक मदत मिळेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले .सर्व निकष बाजूला ठेवत शेतकरी केंद्रबिंदू ठेवला आहे. कितीही ओढाताण झाली तरी शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एनडीआरएफ व्यतिरिक्त अतिरिक्त 10 हजार रुपयांची मदत सरकार करणार आहे असे फडणवीस यांनी सांगितले .
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केंद्राच्या मदतीबाबत चर्चा केली आहे .महाराष्ट्र सरकारच्या मागे केंद्र सरकार उभे राहील असे केंद्राने आश्वासन दिले आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली .राज्य सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत करणार याकडे शेतकरी डोळे लावून होते .त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाने हे पॅकेज जाहीर केले आहे .

