आंध्र प्रदेशच्या फार्मा कंपनीत स्फोट, १७ जणांचा मृत्यू

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
आंध्र प्रदेश :आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४० जण जखमी झाले आहेत. हा स्फोट बुधवारी दुपारी जेवणाच्या सुटीत सव्वादोनच्या सुमारास झाला होता. स्फोटाच्या प्रचंड आवाजामुळे परिसरातील नागरिकही घाबरले होते.
अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसेन्शिया ॲडव्हान्स सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी हा स्फोट झाला. या कारखान्यात ३८१ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. दुपारी स्फोट झाला तेव्हा कर्मचाऱ्यांची जेवणाची सुट्टी होती. त्यामुळे उपस्थिती कमी होती. शॉर्टसर्किटमुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
जखमींना अनकापल्ली आणि अच्युथापुरम येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाच्या सहा गाड्यांनी आग आटोक्यात आणली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुर्घटनेबदद्ल दुःख व्यक्त केले आहे आणि नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले आहे.