शिक्षकांना दर्जात्मक शिक्षण द्यावंच लागेल

पुणे, प्रतिनिधी : शिक्षणाचा दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी सहा महिने प्रशिक्षण देणार. त्यातूनही दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांचा पन्नास टक्के पगार कापणार आणि तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केसरकर म्हणाले की, “इंग्रजी ही कधीही जगाची भाषा नव्हती आणि नसणार आहे. इंग्रजी ही फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर संवादासाठी वापरली जाणारी भाषा आहे. प्रत्येक देशाला स्वतची भाषा असते. त्या देशातील सर्व व्यवहार त्या भाषेत चालतात. जर या मुलांना जर्मन भाषा शिकवली नाही तर ही मुलं जर्मनीत जाऊ शकत नाही. त्याचं प्रशिक्षण सध्या सुरु आहे. शासकीय नोकरीत आरक्षण हवं म्हणून महाराष्ट्र पेटवायचा आणि किती संधी आहे हे युवकापर्यंत पोहोचवायचं नाही हा विरोधाभास आहे,” असं ते म्हणाले.
“शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील. पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही यामुळे मुलं निर्धास्त राहतात. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी येतं की नाही याची चिंता कोणी करत नाही. यापुढे शिक्षकांना ही मुभा राहणार नाही. अनेक शिक्षकांना लाख, सव्वा लाख पगार असतो. मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
“सीबीएसई आणि आपल्या बोर्डात काही फरक नाही. आपला अभ्यासक्रम त्यांच्या तुलनेचा आहे. इंग्रजी माध्यमातच जाणारी मुलं हुशार आहेत असं काही नाही. अव्वलमध्ये येणारी अनेक मुलं जिल्हा परिषदेतील आहेत. इंटरनॅशनल स्कूलचा भारतीय शिक्षणव्यवस्थेशी किती संबंध आहे याची मला शंका आहे. एकाच वेळी आपण 40 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो, हा जगात रेकॉर्ड आहे,” असंही ते म्हणाले.