लोणावळा, खंडाळ्यात पर्यटनावर निर्बंध

पिंपरी, प्रतिनिधी : पावसाळा सुरू झाला की लोणावळा, खंडाळा परिसरातील नैसर्गिक सौंदर्य सर्वांना खुणावते. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात. दरम्यान, भुशी धरण परिसरात पाचजण वाहून गेल्याची दुर्घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भुशी धरण आणि लोणावळा परिसरातील विविध ठिकाणांवर निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत राहणार आहेत.
पुढील काही दिवसांत लोणावळा परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे धरणातील पाणी वाढणे, नद्या, ओढ्यांना पूर येणे, दरड ढासळणे असे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यासह नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. भुशी धरण परिसरात घडलेल्या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यामुळे आता या परिसरातील पर्यटनावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोणते निर्बंध घातलेत प्रशासाने?
- लोणावळा जवळील सहारा ब्रिजवर वाहने पार्क करण्यास आता पूर्णपणे बंदी आहे.
- सहारा ब्रिजसमोरील तीन लहान धबधब्यांच्या वरच्या भागात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.
- भुशी धरणात रेल्वे गेस्ट हाऊस पासून वरच्या दिशेने जाण्यास पूर्णपणे मनाई आहे.
- भुशी धरणाच्या पश्चिम वायरच्या डाव्या बाजूला वनविभागाच्या जागेपासून वरच्या धबधब्यापर्यंत जाण्यास प्रतिबंध आहे.
- लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट आणि शिवलिंग पॉइंटवर संध्याकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत प्रवेश प्रतिबंधित आहे.