राज्यभरात पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात आणि राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.
आजच्या उपग्रहाद्वारे मिळालेल्या छायाचित्रांनुसार, पुढच्या 3-4 तासात मुंबई, ठाण्यासह कोकण पट्ट्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. मागच्या 24 तासात कोकणात जोरदार पाऊस कोसळतो आहे. मागच्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात सतत पाऊस कोसळतोय. मुंबईत सूर्य दर्शन कमी झालं असून ढगाळ वातावरण जास्त असतं.
रात्री सुरु झालेल्या पावसाचा जोर सकाळपर्यंत कायम होता आणि त्यानंतरही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. त्यामुळे कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. आजही मुंबईकरांची पहाट तशीच झाली. सकाळच्यावेळी पावसाचा जोर जास्त होता. त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे वाहतुकीवर झाला. कल्याण वरून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरू आहे. तसेच हार्बर लाईनवरील लोकलही 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरु आहे. शनिवार पहाटेपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली. मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले.
पालघरला ऑरेंज अलर्ट
मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलय. पण त्यामुळे वाहतूक कोलमडलेली नाही. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईच एपीएमसी मार्केटमध्ये देखील पाणी साचलं आहे. मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या उपनगरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून अंधेरी, कांदिवली, मालाड, बोरिवली, दहिसर, गोरेगाव या भागांतही जोरदार पाऊस सुरू आहे.
नागपुरात सकाळपासून पावसाचं थैमान आहे. विमानतळाचं प्रवेशद्वार पाण्याखाली गेलं आहे. रेल्वेस्थानकाला नदीचं स्वरूप आलं आहे. ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवरही पाणी आलं आहे. नागपूरमध्ये अनेक इमारतींच्या तळमजल्यावर पाण्याचं तळं साचलं आहे. अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं आहे. नागपूरमध्ये प्रियंकावाडी वस्तीला तलावाचं स्वरूप आलं आहे.