यशश्री हत्या प्रकरणात आरोपाला पोलिस कोठडी

मुंबई, प्रतिनिधी : गेले काही दिवस चर्चेत आलेल्या उरण येथील यशश्री हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी दाऊद शेखला आज (बुधवारी) कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांना चकवा देत ठिकठिकाणी फिरत राहिलेल्या दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला आज (बुधवारी) मुंबईतील कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताब्याची मागणी केली होती. यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने दाऊदला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस दाऊदची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊदने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानेच यशश्री शिंदेची हत्या केली आहे. त्याने हत्या का केली? त्याचे आणि यशश्री शिंदेचे काय संबंध होते? याबाबत पोलीस चौकशी करणार आहेत.
पोलिसांनी दाऊच्या अटकेची बातमी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. पोलिसांनी सांगितलं होतं की, मुलीचा मृतदेह झाडीत टाकण्यात आला होता. त्यामुळे श्वानांनी तिच्या चेहऱ्याचे लचके तोडल्याची शक्यता आहे. दाऊद आणि यशश्री हे दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखायचे. त्यांचे फोनवर बोलणे देखील व्हायचे, असेही पोलिसांना तपासातून निष्पन्न झाले होते.
दरम्यान, उरणच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे. अनेक राजकीय नेत्यांनी यावरून भाष्य केलं आहे. याशिवाय अनेकांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे. दोन दिवसापूर्वी या घटनेच्या निषेधार्थ उरणमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला होता. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी झाली होती.
काय आहे मूळ घटना?
२५ जुलै रौजी उरणची यशश्री बेपत्ता झाली होती. ती बेलापुरमध्ये एका सरकारी कंपनीत काम करायची. ती घरी परत न आल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यशश्रीचा शोध सुरु केला होता. पोलिसांना यशश्रीचा मृतदेह रेल्वेस्टेशन जवळ आढळून आला. मृतदेहाची विटंबना करण्यात आली होती. तिच्या चेहऱ्यावर, गुप्तांगावर वार करण्यात आले होते.