झारखंड : कार झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात (दि. १८ जुलै) मार्गदर्शन करत असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी मोहन भागवत यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली.
झारखंडमधील कार्यक्रमात बोलत असताना भागवत म्हणाले, “जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तिथवर आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोहोचल्यावर मानवाचे सुपरमॅन बनू पाहतात. सुपरमॅन बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे. पण पूजनीय म्हणतात आमच्यापेक्षा देव मोठे, तर देव म्हणतो माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे. आता विश्वरुपाच्या पुढेही काही आहे का? हे कुणाला माहीत नाही. विकासाचा काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे.”
भाजपच्या अहंकाराला पायबंद घालण्याचे सरसंघचालकांचे काम खुद्द प्रभू रामचंद्रांनी केले…!
‘‘गेल्या २००० वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले गेले, पण ते भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. करोनानंतर जगाला कळले की भारताकडे शांती आणि आनंदाचा रोडमॅप आहे, असे भागवत म्हणाले. ‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.
मोहन भागवत पुढे म्हणाले, विकासाचा काही अंत नसतो. तुम्ही काही झाडे लावली. पण झाड लावणे, हे सुरूच राहिले पाहीजे. सर्वांना शिक्षण दिले, पण नवी पिढी येईल, तिलाही शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षण निरंतर चालत राहिले पाहिजे. आरोग्याचा प्रश्न असेल, यात सातत्याने काम करत राहिले तरच समाधान मिळू शकेल