महाराष्ट्राला सापत्न वागणूकच : रोहित पवार

दिल्ली : देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात बिहार तसेच आंध्रप्रदेश या राज्यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत कोणतीही विशेष घोषणा झालेली नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमावर पोस्ट करत टीका केली आहे. भाजप सरकारनं परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला, असे रोहित पवार म्हणाले. आगामी विधानसभा लक्षात घेऊन तरी भरघोस निधीची अपेक्षा होती, मात्र देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हणाले की, देशाच्या तिजोरीत सर्वाधिक धन जमा करणाऱ्या महाराष्ट्राला कायमच सापत्न वागणूक देणारे भाजपा सरकार महाराष्ट्रातून पळवलेले प्रकल्प आणि येणारी विधानसभा लक्षात घेता किमान यंदा तरी भरघोस निधी आणि नवे प्रोजेक्ट देईल ही अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने भाजपा सरकारने आपली परंपरा कायम ठेवत महाराष्ट्राला भोपळा दिला.
कदाचित भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला महाराष्ट्रातील हवेचा अंदाज आला असेल आणि तसा अहवाल नुकताच महाराष्ट्रात येऊन गेलेल्या गृहमंत्र्यांनी दिला असेल. पवार साहेबांवर परवा झालेले आरोप महाराष्ट्रातील याच हवेचे द्योतक होते.