कंबोडियात ६०० हून अधिक भारतीय सायबर स्लेव्ह

कंबोडिया : नोकरीचं आमिष दाखवून कंबोडियामध्ये जवळपास ६५० हून अधिक भारतीय नागरिकांना ‘सायबर स्लेव्ह’ अर्थात एक प्रकारचे गुलाम म्हणून कामास ठेवून फसवणूक केली आहे. या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी कंबोडियातील भारतीय दूतावासाने प्रयत्न सुरु केले आहेत. नोकरीच्या आशेने आलेल्या या भारतीयांना फसगत करुन कंबोडियातील सायबर क्राइम ऑपरेशनमध्ये गुंतवण्यात आलं आहे.
भारतीय दूतावासाने नुकतेच जाहीर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, “आम्ही सातत्याने परिस्थितीचा आढाव घेत असून कंबोडियामध्ये फसगत झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कंबोडिया देशातील कोणत्याही नोकरीच्या प्रस्तावाबाबत सावधगिरी बाळगावी; तसेच कसलाही संशय आल्यास आमच्याकडे त्याबाबतची सूचना तातडीने द्यावी, असा सल्ला आम्ही देतो.”
या कचाट्यातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी नुकतेच भारतीय दूतावासाने कंबोडियन पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्याबरोबर सहकार्य करत सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे, सध्यातरी १४ भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. सुटका करण्यात आलेल्या या व्यक्ती आता एका कंबोडियन सरकारबरोबर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या देखरेखीखाली आहेत.
कंबोडियन पोलिसांनी सध्या सुटका केलेल्या १४ भारतीय नागरिकांपैकी बहुतांश बिहार आणि उत्तर प्रदेशमधील आहेत. केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याने एफआयआर दाखल केल्यानंतर हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या कर्मचाऱ्याने गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला एफआयआर दाखल केला होता. या घोटाळ्यात त्याचे ६७ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर कंबोडियामध्ये बसून घोटाळा करणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली.