“आता आम्हाला पक्की घरे द्या“

पिंपरी, प्रतिनिधी : पूरस्थिती आल्यानंतर आमचे तात्पुरते स्थलांतर होते. मात्र, आता आम्हाला पक्की घरे द्या, अशी मागणी सांगवी मुळानगर येथील पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवारी केली.
गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी मुळा नदीकाठच्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. सांगवी येथील अहिल्याबाई होळकर प्राथमिक शाळेतील निवारा केंद्राला भेट दिली. पालिकेच्या निवारा केंद्रात तात्पुरते वास्तव्य करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुम्हांला महापालिकेने भोजनासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का? त्यावर पूरग्रस्तांनी होकारार्थी उत्तर दिले. एकजण म्हणाला, साहेब, मुळा नदीला पूर आला की आमची घरे पाण्याखाली जातात. अशा वेळी आमचे स्थलांतर केले जाते. भोजन, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र, आम्हाला आता पक्की घरे द्यावीत. त्यामध्ये आम्ही सुखाने राहू शकू.
पूरस्थितीवर पालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी घेतला. आपत्कालीन स्थिती नियंत्रणासाठी मध्यवर्ती आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४X७ कार्यान्वित असल्याचे आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कक्ष स्थापन केल्याचे सांगितले. सोयीसुविधा पुरविण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागात पालिकेच्यावतीने वैद्यकीय सेवा पुरविण्यावर भर दिला जात आहे. त्यामध्ये नागरिकांना विविध औषधोचार पुरविणे, सर्दी, खोकला, ताप व इतर आजाराने ग्रस्त नागरिकांच्या रस्ताचे नमुने तपासणे, त्यांच्यावर औषधोपचार करणे या सुविधा दिल्या जात आहेत. पालिकेच्या विविध निवारा केंद्रांमध्ये वैद्यकीय पथके तैनात असून, आरोग्य तपासणीवर भर दिला जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, माजी महापौर माई ढोरे, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे या वेळी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. दक्षतेचा उपाय म्हणू नागरिकांनी आपल्या इमारतींमध्ये असलेल्या जमिनीखालील आणि इमारतींवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करून घ्यावी. सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर पूरबाधित परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार शहराच्या विविध भागात रस्त्यावरील चिखल साफ करणे, तुंबलेल्या चेंबर्सची स्वच्छता करणे, नदीकाठी जमा झालेला कचरा तसेच गाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे, माती साठलेल्या ठिकाणी पाणी फवारणी करून स्वच्छता करणे, पूरबाधित भागात निर्जंतुकीकरण करणे ही कामे पालिका प्रशासनाने हाती घेतली आहेत.