फडणवीस म्हणतात “मी इथेच आहे“

प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्याबाबत विचारलं असता आता त्यांनी या प्रश्नाला अतिशय खुमासदार आणि तितकेच सूचक उत्तर दिले आहे.
लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात अनेक उलथापालथ होणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. फडणवीस यांच्यासारखा चेहरा महाराष्ट्रातून दिल्लीत जाणार का? या चर्चांना सुद्धा उधाण आले आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी शब्दात सूचक उत्तर दिले आहे.
काय आहे दिल्लीत चर्चा?
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. भाजपाच्या संभाव्य अध्यक्षांबद्दलच्या चर्चांमध्ये अन्य काही नावांबरोबरच देवेंद्र फडणवीस यांचंही नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारण सक्रिय केले जाईल असं बोललं जात असलं, तरीही महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेतले जाण्याची शक्यता नाही.
आगामी काळात काही बदल पाहण्यास मिळू शकतात का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, “राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे उद्या काय घडेल हे राजकारणात कधीही सांगता येत नाही. मात्र तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचं उत्तर मी एकाच वाक्यात देईन मी इथेच आहे.”
सकाळचा नऊचा चेहरा कटुता आणतो!
महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण झाली आहे ती कशी दूर होईल, या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माध्यमं यासाठी जबाबदार आहात. रोज सकाळी नऊ वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता. तिथून सगळी कटुता सुरु होते. त्यानंतर मग दिवसभर तेच सुरु राहतं. तुम्ही तो चेहरा दाखवणं बंद करा. आठ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणातली कटुता दूर होईल.