संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ साप्ताहिकात जातीव्यवस्थेचे समर्थन

मुंबई : जातीयवादाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष नेहमीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ‘पांचजन्य’ साप्ताहिकाने थेट आपल्या संपादकीयमध्ये देशातील जातीव्यवस्थेचे समर्थन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
‘पांचजन्य’मधील अग्रलेखात जातीचे समर्थन करण्यात आले आहे. ‘जात हा भारताला जोडणारा घटक आहे. मुघलांना ही गोष्ट समजली नाही, पण ब्रिटिशांना जात म्हणजे भारतातील त्यांच्या घुसखोरीमधील मोठा अडथळा वाटली होती’, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
‘पांचजन्य’ साप्ताहिकाचे संपादक हितेश शंकर यांनी जातीसंदर्भातील भूमिका अग्रलेखात मांडली आहे. ‘देशातील कामाचे स्वरूप आणि परंपरांवर आधारित वेगवेगळ्या गटांना एकत्र बांधणारी साखळी म्हणून जातीकडे पाहिले जात होते. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशहांनी जातीव्यवस्थेकडे भारताचे संरक्षण करणारा घटक म्हणून पाहिले’, असे त्यांनी म्हटले आहे.
मुघलांनी जातीव्यवस्थेवर तलवारीच्या बळावर हल्ला केला, तर ख्रिस्ती मिशनरींनी सेवा व सुधारणेच्या नावाखाली जातीव्यवस्थेवर प्रहार केला. जातीसंदर्भात भारतीय समाजरचनेमध्ये एक साधी-सरळ धारणा होती. एखाद्याच्या जातीचा विश्वासघात करणे म्हणजे थेट देशाचा विश्वासघात करणे. मुघलांपेक्षा ख्रिस्ती मिशनऱ्यांना भारताला एकसंध ठेवणारे हे समीकरण ज्ञात झाले होते. त्यामुळे त्यांनी जातीव्यवस्थेवरच आघात करण्याचा प्रयत्न केला, असे अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. पुढे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या याच धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीसाठी केला, असा दावा अग्रलेखात करण्यात आला आहे.