दहा वर्षांनंतरही माळीण दुर्घटनाग्रस्तांचा हुंकार कायम

पिंपरी, प्रतिनिधी : दहा वर्षांपूर्वी दरड कोसळून ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे १५१ नागरिकांचा बळी गेलेल्या माळीण दुर्घटनेला मंगळवारी (३० जुलै) दहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, दुर्घटनेच्या दशकपूर्तीत दुर्घटनाग्रस्तांची स्वप्नपूर्ती झालेली नाही. त्यांच्या मनावरील जखमा ताज्या आहेत. वेदनेचा हुंकार कायम आहे. अन् डोळ्यांतील अश्रू आटले तरी ओलावा टिकून आहे.
दुर्घटनेच्या स्मृतीनिमित्त गाव हद्दीत स्मृती स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर सावलीसाठी पत्र्याचे शेड व्हावे, श्री हनुमान मंदिरासमोर सभामंडप व्हावा, पावसाळ्यात गळणाऱ्या घरांचे छत मजबूत असावे, वीज पुरवठा सुरळीत व्हावा, बिलामध्ये सवलत मिळावी, अशा मागण्या ग्रामस्थ करीत आहेत. दहा वर्षांपूर्वी ३० जुलै २०१४ ची सकाळ माळीणवासियांसाठी काळरात्र ठरली होती. रात्रभर पडलेल्या पावसामुळे डोंगराचा कडा कोसळून काही सेकंदात संपूर्ण गावच ढिगार्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत जवळपास दीडशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. निसर्गाच्या कोप भयंकर होता. त्याच्या जखमा अजूनही माळीण वासियांच्या अंगावर शहारे आणतात. आठवणी थरकाप उडवितात. जिवाभावाचे नातलग गेले. सगे सोयरे गमावले. अख्खे गाव गाडले. मात्र, त्यामागे आमच्या आठवणी दडलेल्या आहेत, अशा भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, दुर्घटनेच्या दशकपूर्तीनंतरही नवीन माळीणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधांतरी आहे. अजूनही माळीणकरांना डोक्यावर हंडा घेऊन आसाणे येथून पाणी आणण्याची नामुष्की येत आहे. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्याच्या सुरवातीला हे चित्र सर्रास दिसून येते. दुर्घटनेत गावातील ४४ कुटुंबांतील १५१ लोक दगावले. कित्येक पाळीव प्राणी कायमचे विसावले. गावातील केवळ नऊ जण आणि बाहेरगावी असलेले ३९ जण एवढेच बचावले होते. दुर्घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले. बचावलेल्या लोकांचे तात्पुरत्या पत्र्याच्या निवारा शेडमध्ये पुनर्वसन केले. यानंतर आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले. येथे ६८ घरे बांधण्यात आली. त्यांचे लोकार्पण एक एप्रिल २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.