जय जवान करणार दहा थरांचा विक्रम?

विक्रोळीत जय जवान पथकाने लावले नऊ थर; आता प्रतीक्षा विक्रमाची
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह आहे. मुंबई आणि ठाण्यात दही हंडीच्या पथकांचा उत्साह काल रात्रीपासूनच ओसंडून वाहात आहे. रात्री बारा वाजता कृष्ण जन्मानंतर ही पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
आज सकाळपासून राज्यभरासह मुंबई, ठाणे, विक्रोळी, जागेश्वरी, दादर अशा विविध ठिकाणी उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव सुरू झाला आहे. वेगवेगळ्या शहरांमधील गोविंदा पथके एकापेक्षा एक सरस थर लावून विजयी सलामी देत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता दहीहंडी पथकांना आयोजकांकडून यंदा भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
मुंबईत जय जवान गोविंदा पथक हे अतिशय लोकप्रिय गोविंदा पथक असून या पथकाने विक्रोळीतील कार्यक्रमात नऊ थरांची सलामी दिली आहे. यंदा जय जवान गोविंदा पथ दहा थरांची सलामी देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या पथकाकडे अनेकांच्या नजरा आहेत.मागील अनेक वर्षांपासून जय जवान गोविंदा पथकाने अनेक बक्षिसे जिंकली आहेत. यंदाच्या दहीहंडी उत्सवात जय जवान पथकाने सर्वात आधी विक्रोळीतील आयोजित कार्यक्रमात ९ थरांची सलामी दिली. त्यानंतर ते १० थर लावणार असल्याची चर्चा आहे. हे गोविंदा पथक मुंबईतील विविध ठिकाणी जात एकावर एक मानवी थर रचून सलामी देतात. शेवटच्या थराला या गोविंदा पथकाने चार एक्के लावत सलामी दिली.
जय जवान पथकासाठी यंदा ही दहीहंडी खास आहे, कारण या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच शेवटच्या चार थरांना चार एक्के लावले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून हे पथक दहीदंडीचा सराव करत होते. त्यानंतर दहीहंडीच्या दिवशी या पथकाने पहिलीच नऊ थरांची सलामी विक्रोळीतील टागोरनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात दिली.
दादर येथील आयडियल गल्लीत महिला पथकाने दहीहंडीचे थर लावत सलामी दिली, तर ठाण्यात रणझुंजार गोविंदा पथकाने सलामी दिली. ठाण्यातही दहीहंडीचा उत्साह जोरात आहे. अनेक पथकांनी संकल्प प्रतिष्ठान दहीदंडीमध्ये थर लावत सलामी दिली.