प्रज्ञानबोधिनीमध्ये आजी आजोबा मेळावा उत्साहात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधीशाळेच्याां : चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लीश मीडियाम शाळेच्या द्विदशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेत नुकताच आजी आजोबा मेळावा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये सुमारे १०० आजी आजोबा यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सचिव श्री यादवेंद्र जोशी व अध्यक्ष मदनलाल कांकरिया हे यावेळी उपस्थित होते. प्राथमिक व माध्यमिकच्या निवडक विद्यार्थ्यांनी नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली. सहावी व सातवीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. बालवर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन प्रदर्शन केले. कृष्णा कृष्णा हे बडबड गीत विद्यार्थ्यांनी सादर करून गोष्टी सांगितल्या व गाणी म्हटली. संगीत व नाटकांनी कार्यक्रमात रंगत आणली. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी तबल्यांची जुगलबंदी करून दाखवली. पथनाट्याद्वारे पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.
शिक्षकांनी आजी-आजोबांना काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे त्यांनी दिली. शाळेच्या संस्कारांमुळे या शाळेची मुले उत्तम घडतात, असे आजी आजोबा म्हणाले. आई-वडिलांनी सोशल मीडिया व टीव्हीवर बंधने घातली पाहिजेत असे मत मांडले. शाळेबद्दल बहुसंख्य आजी-आजोबांनी गौरवोद्गार काढले.
समारोपाच्या भाषणात यादवेंद्र जोशी म्हणाले की, आपल्या देशातील कुटुंब पद्धतीमुळे हा देश एकसंघ आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे समाज टिकून आहे. शहरात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये आजी आजोबांची उणीव जाणवते. मुलांकडे पुरेसं लक्ष देण्याची जबाबदारी नोकरीमुळे आई वडील पार पाडू शकत नाहीत. कुटुंबात आजी आजोबांच्या संस्काराने नातवंडे चांगली घडू शकतात आणि घरपण जपले जाते.
शिक्षिका नीता शिवतारे आणि रोहिणी खोत यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अपर्णा गोवंडे यांनी प्रास्ताविक केले.