फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

रतन टाटांच्या सन्मानार्थ राज्य सरकारचे दोन महत्त्वाचे निर्णय

रतन टाटांच्या सन्मानार्थ राज्य सरकारचे दोन महत्त्वाचे निर्णय

मुंबई : रतन टाटांच्या सन्मानार्थ राज्य सरकारनं दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. रतन टाटाजी केवळ एक उद्योगपती नव्हते. ते समाजासाठी कटिबद्ध असलेलं एक व्यक्तीमत्त्व होतं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही उद्योग रत्न पुरस्काराचं नाव बदलून रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार केलं आहे. मुंबईत तयार होणाऱ्या सगळ्यात मोठ्या इमारतीला, उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देण्यात येणार आहे, असं सामंत यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे राज्य सरकारचा पहिला उद्योग पुरस्कार रतन टाटांनाच मिळाला आहे. १९ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगपती रतन टाटांच्या घरी गेले होते. गेल्या वर्षी टाटांना जो पुरस्कार मिळाला, त्याच पुरस्काराला आता त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न मिळावा यासाठी राज्याच्या कॅबिनेटनं प्रस्ताव मंजूर केला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे. याआधी शिंदेसेनेचे नेते राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रही लिहिलं होतं. रतन टाटांना भारतरत्न मिळावा यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवावा. तीच त्यांच्यासाठी योग्य श्रद्धांजली ठरेल, अशा भावना कनाल यांनी व्यक्त केल्या होत्या.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"