जळगावजवळ रेल्वेखाली १३ जण चिरडले

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
जळगाव (वृत्तसंस्था) : लांब पल्ल्याच्या धावत्या रेल्वेत आग लागल्याच्या अफवेनं उडालेल्या गोंधळात काही प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी रेल्वेतून उड्या मारल्या पण दुसऱ्या ट्रॅकवरून पाठीमागून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून १३ जणांचा मृत्यू झाला. यात १४ जण जखमी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील माहेजी – परधाडे स्थानकादरम्यान प्रवाशांनी उड्या मारल्या आणि सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात चौघांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये १० पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृत प्रवासी हे उत्तरप्रदेश, बिहार आणि नेपाळ येथील आहेत. काल संध्याकाळी पुष्पक एक्स्प्रेस ही मुंबईच्या दिशेने निघाली होती. पाचोरा शहाजवळ परधाडे स्थानकाजवळ गाडी आली असता, कोणीतरी अचानक डब्यातली चेन खेचली, परिणामी चालकाने एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चाकं रुळांवर घासली गेल्याने ठिणग्या उडाल्या आणि ट्रॅकवर असलेल्या एका कपड्याने पेट घेतला. धूरही येऊ लागला. ते पाहून कोणीतरी आग लागल्याचे सांगितले आणि रेल्वेच्या डब्यात प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
डब्याला आग लागल्याची अफवा उडताच प्रवाशांनी गाडीतून उड्या मारण्यास सुरुवात केली. पण त्याच वेळी शेजारच्या ट्रॅकवरून मागच्या बाजूने कर्नाटक एक्सप्रेस येत होती. कर्नाटक एक्सप्रेसच्या चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत प्रवासी गाडीखाली चिरडले गेले होते.