शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे टेन्शन वाढले

मुंबई : विधानसभा निवडणुकीत यंदा राज्यात महायुतीचे आणि त्यानंतर २०२९ मध्ये फक्त भाजपचे सरकार सत्तेवर येईल. ते सरकार एकट्या कमळाचे असेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अमित शहा यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे आता आपले काय होणार? म्हणून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे टेन्शन वाढले आहे.
राज्यात सद्यस्थितीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ट्रिपल इंजिन महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे २०२९ मध्ये फक्त भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेवर येणार असेल, तर शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांचे काय होणार? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचा दावाही अमित शहा यांनी केला.
अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. गेल्या महिन्याभरातील त्यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अमित शहा म्हणाले, काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात, हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील ६० वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला सलग तीन वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचेही अमित शहा यांनी सांगितले.सगळीकडे झारखंड किंवा हरयाणात काय होणार? असे कुणीही विचारत नाहीत. केवळ महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न विचारतात, असे अमित शहा म्हणाले. तोच धागा पकडून आता महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला. त्यावर कार्यकर्त्यांनीही महायुती जिंकणार, असे उत्तर दिले.
राज्यात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही – अजित पवार
सगळ्यांनाच आपापला पक्ष वाढवायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचे सरकार येऊच शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकते. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. १९८५ नंतर चाळीस वर्षांत राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आले नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमित शहांनी हे वक्तव्य केले असेल. त्यांना त्यांचा पक्ष ‘सिंगल लार्जेस्ट पक्ष’ करण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमित शहा यांच्या दाव्यातील हवाच काढून घेतली.