फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : महायुतीला भरघोस मतं मिळाल्यानंतर आता तीनही पक्षांपैकी कोणता नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो, याची चर्चा गेले काही दिवस रंगलेली होती. आता या सगळ्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विधिमंडळ गटनेते म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले असून भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले होते. विधीमंडळ गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडला आहे. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे. कोअर कमिटी बैठक संपल्यानंतर निर्मला सीतारमन आणि विजय रूपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर सेंट्रल हॉल मध्ये गटनेते पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचा राज्यातला निकाल लागून ११ दिवस झाले तरीही महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नावदेखील जाहीर झालेलं नाही. सत्ता स्थापनेचा दावाही केला गेला नव्हता. त्यामुळे विरोधकांनी या सगळ्या बाबींचा खरपूस समाचार आतापर्यंत घेतला. शपथविधी सोहळा पार पडण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धातास चर्चा झाली. या बैठकीला गिरीश महाजन देखील उपस्थित आहे. शिंदे फडणवीसांमध्ये बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं समोर आलंय. या बैठकीमध्ये खातेवाटप, शपथविधी आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर ही बैठक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय बदलल्याचं समोर आलंय.
कोणत्या खात्यावरून रस्सीखेच?
महायुतीत सरकार स्थापनेच्या घडामोडी घडत असताना गृहखात्यावरून रस्सीखेंच सुरू होती. परंतु आता यावर तोडगा निघाल्याचं समोर आलंय. गृहखात्याऐवजी नगरविकास खातं आणि अजून एखादं महत्वाचं खातं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं जाणार असल्याचे सांगितले जाते. उद्या ५ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे महायुतीचा शपथविधी पार पडणार आहे. यासाठी अनेक संत महंत, त्याचप्रमाणे इतर राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील आमंत्रित केलंय. महायुतीचे महत्त्वाचे नेते आज सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल यांच्या निवासस्थानी जाणार आहेत.