बदलापूरच्या घटनेवर काय म्हणतंय सरकार?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बदलापूर येथे शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर उसळलेला जनक्षोप तीव्र आंदोलनात रूपांतरित झाला. या सगळ्याचा आज (मंगळवार) बाजारपेठा, रेल्वे वाहतूक यावर परिणाम झाला. दरम्यान, या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला आणि या प्रकरणी सरकार उचलत असलेल्या भूमिका नागरिकांसमोर मांडल्या.
आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गिरीश महाजन बदलापूर येथे आले होते. यावेळी ते म्हणाले की, या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि अन्य दोन लोकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविले जाणार आहे. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस सोपविण्यात आली आहे. ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याची नोंद करून घेण्यास विलंब केला आहे, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जनतेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहे. मात्र, अत्याचार करणाऱ्याला जनतेच्या ताब्यात द्या आणि इथेच आणून त्याला मारून टाकू, हे घडणार नाही.
आंदोलनस्थळी नागरिकांनी मोठा गोंधळ केला. आंदोलन जनक्षोभातून उसळलेले होते. घडलेल्या निर्घृण प्रकारामुळे लोक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे आंदोलनाला कोणतेही नेतृत्व नव्हते. त्यामुळे आंदोलकांशी संवाद साधणे कठीण होते, असे महाजन यांनी नमूद केले.
सात दिवसांपूर्वी बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यांचे वय वर्ष आहे फक्त साडेतीन. शाळेतील कर्मचाऱ्याकडूनच हा अत्याचार झाल्याचे सात दिवसांनी उघड झाले. त्यानंतर शाळेतील पालकांनी आज सकाळपासून तीव्र आंदोलन केले आहे.