देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द

सर्वपक्षीय नेत्यांकडून डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज (२७ डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री ८ वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ९.५१ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, २७ डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज ११ वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आज भारत शोक व्यक्त करत आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे लिहिले, “डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती मी सहसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती…”
राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.
मनमोहन सिंग यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते. ३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच २००४ ते २०१४ या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच १० वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने भारतीय राजकारणाने एक सालस नेता गमावला आहे.