केंद्रीय मंत्र्यांचेच कुटुंब सुरक्षित नसेल तर..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मंत्र्यांचेच कुटुंब राज्यात सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचे काय, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे सुरक्षारक्षक सोबत असताना त्यांची कन्या आणि तिच्या मैत्रिणींची काही युवकांनी छेड काढली. तसेच सुरक्षा रक्षकाने गैरकृत्य थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याचीच कॉलर धरून त्याला दमदाटी करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर घडला प्रकार समोर आला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे की, जिथे केंद्रीय मंत्र्यांचे कुटुंब देखील सुरक्षित नाही, अशा राज्यात सर्वसामान्य जनतेचे काय होणार?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणी टीका केली असून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राज्यात जंगलराज असल्याचे चिन्ह आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात गुंडांनाच राजाश्रय मिळत असल्यामुळे महिला आणि मुलींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत, तिथे सामान्यांच्या लेकीची अवस्था काय असेल, याचा विचार न केलेला बरा. गुन्हा करणाऱ्या टवाळखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे यांना पोलिस स्टेशनात ठिय्या द्यावा लागतो, यावरूनच राज्यातील गुंडाराज अधोरेखित होत आहे.