राजगुरूनगर;पिडित मुलींच्या शेजाऱ्यानेच कृत्य केल्याची धक्कादायक माहिती!

बहिणींची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड
राजगुरूनगर : कल्याण मधील घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरूनगर मध्ये दोन चिमुकल्या मुलींची हत्या करण्यात आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन मुली अचानक गायब झाल्या होत्या. मात्र त्यांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरा एका इमारतीच्या बाजूला दयनीय अवस्थेत एका पिंपात आढळले आहे. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराजवळून बेपत्ता झाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणी होत्या. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने तिने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर दुसरी बहिणीमुळे घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीने त्याने तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला. यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.
राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवले आहेत, या अहवालातून नेमके काय-काय घडले हे स्पष्ट होईल.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी आहेत. राजगुरूनगर येथे काल दुपारी दोन चिमुकल्या घराजवळ खेळतांना बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत.याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.