फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
विधानसभा २०२४

राहुल कलाटे यांचा चिंचवड टँकरमुक्तचा निर्धार!

राहुल कलाटे यांचा चिंचवड टँकरमुक्तचा निर्धार!

हक्काचे २४ तास पाणी मिळविण्यासाठी लढा
चिंचवड : मतदार संघाला पवनेतून मिळणारे पाणी संपूर्ण शहराला तब्बल ३० ते ४० किलोमीटर वळसा मारून टेल एन्डला येत असल्याने गळती व अन्य कारणामुळे संपूर्ण चिंचवड मतदारसंघात नियमित पाण्याची बोंब आहे. त्यामुळे मुळशी धरणातुन बंद पाईप लाईनद्वारे पाणी आणून येत्या दोन वर्षात टँकर मुक्त चिंचवड करणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडी उमेदवार राहुल कलाटे यांनी दिली.

वाकड, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी परिसरातील सोसायटी रहिवाशांसी संवाद साधताना राहुल कलाटे बोलत होते. यावेळी चिंचवड विधानसभा क्षेत्रातील विविध सोसायटीचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राहुल कलाटे पुढे म्हणाले, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, थेरगाव, रावेत, वाकडसह अन्य भागात फेब्रुवारीत सुरु होणारी पाणी टंचाई उन्हाळा सुरू होतो तशी तीव्र होत जाते. ही टंचाई ऑगस्टपर्यंत कायम राहते. हे नित्याचेच झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सुरळीत व मुबलक पाणीपुरवठ्यात सत्ताधाऱ्यांचे अपयश आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रहिवाशांनी बोअरवेलचा आधार घेतला आहे. मात्र, उन्हाळ्यात बोअरवेलही आटतात तर दुसरीकडे महापालिकेचे पाणी देखील कमी दाबाने येते किंवा पाणी कपात केली जाते. आणि टँकर शिवाय पर्याय रहात नाही. शहर वाढले पण बदलत्या गरजा लक्षात घेऊन नियोजन न केल्याने गेल्या दहा वर्षांपासून इथल्या नागरिकांचे पाण्याअभावी हाल सुरु आहेत.

चिंचवड विधानसभा क्षेत्रात कोट्यावधी कर भरणाऱ्या करदात्यांना, सोसायटी रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. उन्हाळ्यातील चार-पाच महिन्यात टँकर लॉबीवर लाखो रुपये खर्चून त्यांना तहान भागवावी लागते. बोअरवेलने तारले, यंत्रणेने छळले अन टँकर लॉबीने लुटले अशी इथली परिस्थिती.
अपुरा पाणी पुरवठा व कमी दाबाने पाणी मिळत असल्याने टँकरवर वर्षाकाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सोसायट्यांना बसतो. या गळती मागे टँकर लॉबी पोसण्याचे कटकारस्थान गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. ढिम्म प्रशासनाला काहीही फरक पडला नाही. उलट अंमलबजावणीसाठी याचिका दाखल करावी लागली. त्यावर न्यायालयाने प्रशासनाच्या नाकर्तेपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्च पदस्थ अधिकार्‍यांची कमिटी सहा महिन्यापूर्वी गठीत केली व सर्वत्र पुरेसा पाणीपुरवठा होईल यासाठी निर्देश दिले. या कमिटीकडे अनेकांनी तक्रारी केल्या पण तरीही पाण्यासाठीचा संघर्ष संपला नाही.
न्यायालयाचे आदेश असताना ऐन पावसाळ्यात तुम्ही काय केले हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. खरे तर पावसाळ्यात देखील पाणी पुरवठा अपूराच असतो पण केवळ त्या काळात भूगर्भात पाणीसाठा निसर्गाच्या कृपेने उंचावतो आणि बोअरद्वारे त्याचा उपसा करून सोसायटी धारक तहान भागवतात. त्या वेळी ‘मुबलक पाणीपुरवठा’ असल्याचे फुकाचे श्रेय यंत्रणा घेते. सध्या संपूर्ण शहरात पाण्याची परिस्थिती बिकट आहे. न्यायालयास सुद्धा ही ‘कोतवाली’ दाद देत नाही. अशा तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

सोसायट्यांना कायम पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये म्हणुन मी सर्वात आधी प्रयत्न करणार आहे. धरणात पाण्याचा पुरेसा साठा असला तरी मुबलक पाणी सोसायट्यांपर्यंत पोहोचतच नाही. किंवा त्यासाठी टँकरची लाखो रुपयांची बिले अदा करावी लागतात. त्यामुळे येत्या दोन वर्षात मुळशी धरणातील पाणी बंद पाईपद्वारे आणून चिंचवडला कायमचे टँकर मुक्त करणार
– राहुल कलाटे

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"