पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपतींचे अभिभाषण हे विकसित भारताच्या संकल्पाला बळ देणारे, नवीन आत्मविश्वास निर्माण करणारे आणि सामान्यांना प्रेरणा देणार आहे. २१ व्या शतकाचा एक चतुर्थांश कालावधी उलटून गेला तरी यातून काय मिळवले काय गमावले हे काळच ठरवेल. पाच दशकांमध्ये फक्त गरिबी हटाओच्या घोषणा दिल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात काय काम झाले, हे कोणालाच माहिती नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. आमच्या सरकारने पायाभूत सुविधांवर दिला आहे. आधीच्या सरकारने या सुविधांसाठी फार कमी तरतूद केली होती. आम्ही ती रक्कम ११ लाख कोटी रुपयांपर्यंत नेली आहे. यामुळे मजबूत होत असलेला भारताचा पाया राष्ट्रपतींच्या भाषणातून वर्णन केला गेला आहे. सरकारी तिजोरी ही बचतीच्या आधारावर चालली पाहिजे आणि याचा लाभ नंतर जनसामान्यांनाच झाला पाहिजे, या तत्त्वावर आम्ही काम करत आहोत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संविधानाचा आत्मा जगला पाहिजे. आम्ही संविधान जगणारे लोक आहोत. ज्याला संविधानाचा आत्मा कळतो, तोच उत्तम राज्य कारभार चालवू शकतो. आमच्या बरोबरीने विरोधी पक्षनेत्यांना सहभागी करून घेण्यास आम्ही नेहमी प्राधान्य देत आलो आहोत.