पंतप्रधानांनी शिवरायांची मागितली माफी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : सिंधुदुर्गात जे झालं, त्याबद्दल मी वाकून माझ्या आराध्य देवतेच्या चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. तर ते आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभरात आंदोलने सुरू आहेत आणि राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांची फैरी झडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले.
या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झालं. तसेच अनेक विकासकामांचं उद्घाटन झालं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. ते म्हणाले की, “माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा किंवा राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत. मी आज वाकून माझ्या आराध्य देवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असे त्यांनी नमूद केले.