१४ ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ पठण!

पिंपरी : संत ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने एक विशेष निर्णय घेतला असून, १४ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ चे सामूहिक पठण करण्यात यावे, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. शिक्षण आयुक्त, पुणे यांना संबोधित या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५०व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘गोकुळ अष्टमी’ आहे आणि त्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘पसायदान’ म्हणण्यात यावे.
संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ या अमृतवाणीच्या सामूहिक पठणातून विद्यार्थ्यांमध्ये सद्भाव, सहिष्णुता आणि आध्यात्मिक जाणीव वाढवण्याचा शासनाचा हेतू असून, हे अभियान संपूर्ण राज्यभरात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार वसंत महाजन यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, या उपक्रमाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. यासंदर्भातील आवश्यक सूचना सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांना दिल्या जाव्यात आणि त्यांचे योग्य पालन होईल याची खात्री करावी.

