फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

हरी नामाच्या गजराने पंढरी दुमदुमली!

हरी नामाच्या गजराने पंढरी दुमदुमली!

पाच लाख भाविकांच्या साक्षीने कार्तिकी एकादशी सोहळा उत्साहात
पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरीत दाखल झालेल्या सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (ता. १२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती.

कार्तिकी एकादशीला चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली होती. नदीत स्नानाची पर्वणी साधल्यानंतर बहुतांश भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पत्रा शेड दर्शन उभे होते तर दिंडीतील वारकरी नगरप्रदक्षिणेला निघाले होते. कपाळी अष्टगंध, बुक्का याचा टिळा, मुखी पुंडलिक वरद हा घोष, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका व हाती टाळ मृदुंग हा परिवेश धारण करून नगर प्रदक्षिणेला निघालेल्या दिंडीतील भाविकांच्या जयघोषाने पंढरीतील वातावरण भक्तीमय झाले होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व चंद्रभागा नदीचे वाळवंट भाविकांच्या अथांग गर्दीने फुलून गेला होता.

श्री विठ्ठल मंदिर सभोवतालच्या परिसरामध्ये होणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने यंदा प्रथमच बेरीकेडिंग करण्यात आले होते. श्री संत नामदेव पायरी व पश्चिम द्वार परिसरामध्ये इंग्रजी व्ही आकाराचे बेरीकीडिंग केल्यामुळे गर्दीचे विभाजन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन व मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करणे सुलभ झाले होते.

पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांची विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट
कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं. ‘विठ्ठल आमचे जीवन’ या थीमवर आधारित मंदिराला केलेली सजावट व फुलांच्या सजावटीमध्ये तयार केलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा पाहून भाविक आनंदीत झालेले दिसून आले. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या कालावधी दरम्यानच कार्तिकी एकादशीचा सोहळा आला आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राज्यभरातील गावोगावचे बहुतांश भाविक आपापल्या नेत्यांच्या प्रचारात गुंतले आहेत. त्याचा परिणाम कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर देखील झाला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा भाविकांच्या संख्येत २५ ते ३० टक्के घट झाली आहे असे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले. भाविकांच्या संख्येत घट झाल्याने पंढरीतील प्रासादिक साहित्य विक्री व्यावसायिकांसह हॉटेल, लॉजेस यांच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम झाला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"