एक रहेंगे.. सेफ रहेंगे..

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदारांमध्ये निर्माण केला विश्वास
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : २०१४ नंतर नवीन भारत उदयास आला आहे. त्यामुळे पाकिस्तानची घुसखोरीची हिंमत होत नाही. ते छेडतील तर आम्ही सोडणार नाही. घुसून लढाई करू. ही जाणीव झाल्यामुळे हातात कटोरी घेऊन पाकिस्तान जगामध्ये भीक मागत फिरत आहे. म्हणूनच एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भोसरी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे (महायुती) भोसरी विधानसभेचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ गावजत्रा मैदानावर आयोजित भव्य जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. हिंदुत्व, समतावाद, देशाचा गौरव, महाराष्ट्राची अस्मिता, प्रखर राष्ट्रवाद या मुद्यांचा उहापोह योगींनी त्यांच्या २५ मिनिटांच्या भाषणांत घेतला. कलतक बटे तो कटे थे, पर अब बटेंगे नही, तो कटेंगे भी नही, एक रहेंगे, सेफ रहेंगे, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण केला. व्यासपीठावर खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, निरीक्षक प्रदीपसिंह जडेजा, चंद्रकांता सोनकांबळे, नितीन लांडगे उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ यांच्या सभेतील भाषण ऐकण्यासाठी गावजत्रा मैदान माणसांनी तुडुंब भरले होते. दूरपर्यंत माणसं जागा मिळेल तिथे बसली होती. योगी आदित्यनाथ व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आहे. त्यांच्या विचारांचा सन्मान करणारी आहे. आजही देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान केला जातो. त्यांच्याविषयी गौरवाने बोलले जाते.
कुंभमेळ्यासाठी भोसरीला आमंत्रण
अयोध्यामध्ये राम मंदिराची उभारणी झाल्यानंतर रामलल्लाची मूर्ती विराजमान झाली आहे. या दर्शनासाठी आणि पुढील वर्षी प्रयागराजला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मी भोसरीला, पुण्याला आमंत्रित करीत आहे, असे योगी यांनी या वेळी सांगितले.

भाजपा म्हणजे काँग्रेसी समस्येवरचे उत्तर
स्वातंत्र्यानंतर २०१४ पर्यंत देशामध्ये काँग्रेसची राजवट होती. त्या कालावधीत पाकिस्तान भारतात घुसखोरी करीत होते. दहशतवादाला खतपाणी घालत होते. हिंसक घटना घडत होत्या. त्याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवत होतो. परंतु, संबंध बिघडतील या नावाखाली दहशतवादाला थोपविण्याचे धाडस कोणी केले नाही. काँग्रेस ही समस्या असल्याची टिका करून भाजप समाधान असल्याचे मत व्यक्त करीत योगी म्हणाले, काँग्रेसच्या राजवटीत दहाव्या क्रमांकावर असलेली देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचव्या क्रमांकावर आणली आहे. ती पुढील दोन वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे उद्दीष्ट आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात देश प्रगती करीत आहे. हा विकास संस्कृतीचा सन्मान करणारा आहे. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्रात महाअनाडी
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे महायुतीचे सरकार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या सब का साथ, सब का विकास संकल्पनेला बळ देत आहे. देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे, असे नमूद करून योगी आदित्यनाथ यांनी महाआघाडी म्हणजे महाअनाडी आहे. त्यांच्याकडे नितीमत्ता नाही. योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य नाही, अशी टिका केली.
हम साथ रहेंगे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोसरीमध्ये सभा घेतल्यामुळे माझ्यासारखा दुसरा भाग्यवान नाही, असे नमूद करून उमेदवार महेश लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व नजरेसमोर ठेवून कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. उपेक्षितांना आधार, महिलांना सुरक्षा, संत विचारांचा वारसा जतन करीत आहेत. त्यामुळे हम ना बटेंगे, ना कटेंगे, हम साथ रहेंगे, असे मत व्यक्त केले.