‘निसर्गाचा खजिना’ बालकुमारांच्या मनाला भावणारा : राजन लाखे

रश्मी गुजराथी लिखित ‘निसर्गाचा खजिना’ कथासंग्रहाचे प्रकाशन
पिंपरी : ”निसर्गाचा खजिना’ बालकुमारांच्या मनाला भावणारा आणि त्यांचे भावविश्व समृद्ध करणारा आहे!’ असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी एस एम जोशी सभागृह, पुणे येथे मंगळवार, दिनांक १७ मार्च रोजी काढले.

ज्येष्ठ बालसाहित्यिका रश्मी गुजराथी लिखित , यशोदीप पब्लिकेशन्स निर्मित ‘निसर्गाचा खजिना’ या बालकुमार कथासंग्रहाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ बालसाहित्यिका प्रा. डॉ. नीलिमा गुंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
आंब्यांच्या पानांचे आवरण असलेल्या ‘निसर्गाचा खजिना’ या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बाळकृष्ण बाचल यांनी, ‘ज्ञान आणि मनोरंजन यांचा सुंदर समन्वय असलेला ‘निसर्गाचा खजिना’ वाचून बालसाहित्यिक घडतील!’ असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. दिलीप गरुड यांनी संग्रहातील ‘सूर्यफूल’ या कथेचे अभिवाचन केले. रूपाली अवचरे यांनी, ‘आजतागायत प्रकाशित झालेल्या सुमारे पस्तीस पुस्तकांच्या माध्यमातून रश्मी गुजराथी यांच्या लेखनातील सामाजिक बांधिलकीची जाणीव प्रतीत होते’ असे मत व्यक्त केले. रोहित गुजराथी आणि रुचिता जोशी यांनी आपल्या मनोगतातून आई आणि कथालेखिका अशा दुहेरी नात्यांचे हृद्य अनुबंध उलगडून दाखविले; तर स्नेही परिवाराच्या वतीने संगीता ववले यांनी प्रातिनिधिक स्नेह भावना व्यक्त केली.
लेखिका रश्मी गुजराथी यांनी आपल्या मनोगतातून, ‘निसर्गाचे विविध विभ्रम आपल्याला आवडतात. तो समृद्ध निसर्ग कथांच्या माध्यमातून अक्षरबद्ध केल्याने बालवयातच मुलांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजतील!’ असा विश्वास व्यक्त केला. डॉ. नीलिमा गुंडी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “निसर्गाचा खजिना’चे मुखपृष्ठ, आतील चित्रे आणि तपशील बालमनाचे कुतूहल जागृत करणारा आहे. . सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री गुजराथी यांनी आभार मानले.

