धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी संवेदनशीलता दाखवून महाराष्ट्र सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली आहे. पवनचक्की प्रकल्पाशी निगडीत ऊर्जा कंपनीविरुद्ध खंडणीचे प्रयत्न रोखण्याच्या प्रयत्नांत ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. या सगळ्या प्रकरणाच्या तपासात याच्याशी संबंधित असलेल्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यालाही अटक झाली आहे.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. अशा परिस्थितीत मुंडे यांचा राजीनामा का घेतला जातनाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारावे लागेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. यापूर्वीच्या घटनांमध्ये ज्या कोणावरही आरोप झाले आहेत, तेव्हा नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला गेला आहे. आताही राजीनाम्याची मागणी होत आहे, पण ते राजीनामा का घेत नाहीत, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
(संदर्भ – पीटीआय)