माहूरमध्ये ५० भाविकांना विषबाधा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नांदेड : भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने माहूर तालुक्यात ५० हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. आज (रविवारी) पहाटे ही घटना घडली. सर्व रुग्णांना माहुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.
माहूर शहरात षट्टतीला एकादशी निमित्त ठाकूर बुवा यांची यात्रा भरते. या तीर्थक्षेत्र स्थानी राज्यभरातून अनेक पायी दिंड्या माहूरमध्ये दाखल होतात. विविध मठात, मंदिरात, मैदानांवर या दिंड्या स्थिरावतात. राहुट्या उभारल्या जातात. २४ जानेवारी रोजी हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात जवळा (बु) येथील दिंडी देवदेवेश्वर परिसरात दाखल झाली होती. दुसऱ्या दिवशी दर्शन केल्यानंतर भाविकांनी रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेकांना हा त्रास सुरू झाला.
घटना समजताच माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद मुळे, सर्फराज दोसानी यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि रुग्णांची विचारपूस केली.