नवरात्र उत्सव काळात महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता!

पुणे : गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र, कोकण सह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नवरात्र उत्सव , दुर्गापूजा काळात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात 24 सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात 28 सप्टेंबर पर्यंत जाणवू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे .
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाडा. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बीड .धाराशिव. संभाजीनगर. अहिल्यानगर. सोलापूर .सातारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 26 सप्टेंबरला राज्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकरी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .यासोबतच कृषी विभागाने ही शेतकऱ्यांना सूचना दिले आहेत .हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार राज्यातून मान्सूनचा निरोप किमान 30 सप्टेंबर पर्यंत तरी होण्याची शक्यता नाही. राज्यातील शेतकरी विशेषतः द्राक्ष ,सोयाबीन ,कापूस, उडीद व तुर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार आपली शेती व्यवस्थापनाची तयारी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे
नवरात्र उत्सव काळात मुंबई, पुणे व महाराष्ट्रात मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे . आयोजकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी (अतिरिक्त पाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे) : वायव्य + पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले खोल दाब क्षेत्र, दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ, पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असून त्यामुळे २६ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे व महाराष्ट्र राज्यातील हवामानावर परिणाम होईल.

२६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. नियोजन विचारपूर्वक करा. सध्याच्या पुढील ४८ तासांत पुणे व परिसरात गडगडाट, वीजांसह पावसाची शक्यता आहे. वीजांच्या कडकडाटाच्या काळात कधीही झाडाखाली किंवा उघड्यावर उभे राहू नये.

