गणेशोत्सव अन् मतांची पेरणी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी राज्यभर जोमाने सुरू आहे. जनतेच्या मनात आपला पक्ष आणि उमेदरवार यांच्या नावाची पेरणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाताशी घेत मतांची पेरणी सुद्धा सुरू झाली आहे.
वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. महिलांसाठी सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम ही फार पूर्वीपासूनची पद्धत आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना मोठमोठी आकर्षक बक्षीसे देऊन पक्षांनी त्यांना आपलेसे केले. आता विविध धार्मिक यात्रांचे आयोजनही केले जाते आहे. श्रावणानिमित्त भगवान शंकरांच्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येईल, अशी सोय काही उमेदवारांनी करून दिली. कोकणवासीयांना गणपतीसाठी कोकणात वेळेत पोहोचण्यासाठी अनेकांनी बसची सोय करून दिली. काही जणांनी अगदी मोफत प्रवास देखील घडविले.
भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं. दरवर्षीप्रमाणे शाहांचा गणेश दर्शन दौरा असला, तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यास विशेष महत्त्व आहे, असं सांगितलं जातं आहे. दर्शनानिमित्त मुंबईत आले असता, शाह यांनी भाजपा नेत्यांची महत्त्वाची बैठकही घेतली. अमित शाह यांनी राजकीय चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या आहेत.