इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत राज्य अग्रेसर होणार

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : राज्यात मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार मोठ्या विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच, जुलै महिन्यात ८० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, राज्यात दोन महिन्यात २ लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ३५ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याने, महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
टॉवर सेमीकंडक्टर कंपनीचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सेमीकंडक्टर निर्मितीचा मोठा प्रकल्प पनवेल येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ५८ हजार ७६३ कोटी तर दुसऱ्या टप्यात रूपये २५ हजार १८४ कोटी अशी एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे १५ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे.
ई-व्हेइकलची निर्मिती
स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा प्रकल्प पुणे येथे एकात्मिक पध्दतीने स्थापना करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण १२ हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे एक हजार रोजगार निर्मिती होणार असून प्रकल्पातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रीक व्हेईकलचे निर्मिती केली जाणार आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचा प्रकल्प राज्याचे इलेक्ट्रीक वाहन प्रोत्साहन धोरणांतर्गत इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २१ हजार २७३ कोटी एवढी गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून १२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. मराठवाड्यातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग घटकांना त्याचा फायदा होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर यांचा इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक होणारा छत्रपती संभाजीनगर येथील दुसरा अतिविशाल प्रकल्प आहे. यापूर्वी जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी यांचा छत्रपती संभाजीगनर येथे इलेक्ट्रीक वाहन निर्मितीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
रेमंड लक्झरी कॉटन्स यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनींग, यार्न डाइंग, विव्हिंग ज्यूट, विव्हिंग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन ह्या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगाव पेठ, जि.अमरावती येथे होणार आहे. या प्रकल्पात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.
भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टी धोरणांमध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक मोठ्या प्रमावर होत आहे. राज्यातील तरुणांच्या हाताला देखील प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे काम मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन आणि विकासाला चालना मिळून एक मजबूत स्थानिक पुरवठा साखळी विकसित होण्यास मदत होणार आहे.