शेतकरी उत्पादक कंपनीनी ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन!

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत
पुणे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया अंतर्गत सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकामध्ये काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ३० एप्रिल २०२५ अखेर अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
‘मूल्य साखळी भागीदार’ होण्याकरीता पात्रता पुढीलप्रमाणे: संस्थेच्या स्थापनेला कमीत कमी ३ वर्ष पूर्ण झालेली असावी, २०० हून अधिक शेतकरी सदस्य, सरासरी ९ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल, सहकारी संस्थांसाठी उद्दिष्टांमध्ये तेलबिया संदर्भ असणे आवश्यक, शासकीय योजनांतर्गत तयार झालेल्या संस्थांना प्राधान्य. शासकीय संस्था नसल्यास तेलबिया, खाद्यतेल व बियाणे क्षेत्रात कार्यरत असलेल्या सार्वजनिक, खासगी संस्थांनाही “मूल्य साखळी भागीदार” म्हणून काम करण्यास संधी मिळणार असून त्यांच्यासाठी वेगळे गुणांकन निकष ठेवण्यात आले आहेत.

राज्यामध्ये तेलबियांच्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ करण्यासोबतच खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांची ‘मूल्य साखळी भागीदार’ म्हणून निवड केली जाणार आहे.
तेलबिया पिकांमधील उत्पादन वाढीसोबतच शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचा या योजनेचा उद्देश असून जिल्ह्यातील पात्र संस्था, कंपन्यांनी संबंधित “तालुका कृषी अधिकारी” कार्यालयास वेळेत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.