केमिकल मिश्रित पाण्यामुळे मासे मृत

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : दूषित आणि केमिकल मिश्रित पाण्यामुळे पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ मुळा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप, आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाने देखील फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे, असा आरोप काळे यांनी केला आहे. ते म्हणाले की, पिंपळे निलख स्मशानभूमी येथून वाहणाऱ्या मुळा नदिपात्रात दूषित व केमिकल मिश्रीत पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फक्त तोंडदेखली कारवाई केली जाते.
केमिकल मिश्रीत पाणी सोडून या जलचर प्राण्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळ नाही. मुळा नदीत मृत माशांचा खच आढळून आल्यानंतर पिंपळे निलख येथील नागरिकांनी आम आदमी पार्टीचे नेते रविराज काळे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर काळे यांनी नदीपात्रात जाऊन पाहणी केली. याबाबतची माहिती महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आली असल्याचेही रविराज काळे यांनी सांगितले.