मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी कालच लातूर येथे एका जाहीर बैठकीत राज्याच्या जनतेची माफी मागितली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणी माफी मागितली आहे.
छत्रपती शिवराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर विरोधकही आक्रमक झाले आहेत. या घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. यात राज्यसरकारचे मंत्री आणि नौदलाचे अधिकारी तसेच पोलिस उपस्थित होते. बैठकीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यात नौदलाचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी पुतळा उभा करण्यात आला, तेथील वातावरण, वाहणारे वारे आणि एकूण हवामानाचा अंदाज घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन आणि मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. विरोधकांनी या मुद्द्यावरून राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. शिवरायांच्या पायावर मी हजार वेळा नतमस्तक होऊ शकतो. अजित पवार यांनी तर याबद्दल माफीही मागितली आहे. आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही. तसेच विरोधकांनीही करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.