दिल्लीतील ४० शाळांना धमकीचे मेल

बॉम्ब ठेवल्याची अफवा; सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना घरी परत पाठवले; धमकी सत्राची पुनरावृत्ती
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील जवळपास ४० शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे मेल आले आहेत. मेलद्वारे तब्बल ३० हजार अमेरिकन डॉलरची मागणी करण्यात आली आहे. शाळांनी तातडने याबाबत पालकांना माहिती देत सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना सोडले आहे.
आज सकाळीच अनेक शाळांना धमकीचे मेल आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा व्यवस्थापनाने तातडीची पावले उचलत वर्ग रद्द करून विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. सगळ्यात आधी सकाळी सव्वासहा वाजता जीडी गोएंका पश्चिम विहार आणि त्यानंतर सात वाजून सहा मिनिटांनी डीपीएस आरके पुरम या शाळांना धमकीचे मेल आले, अशी माहिती दिल्लीतील अग्निशामक विभागाने दिली आहे.
मेलबाबतची माहिती मिळतात तातडीने अग्निशामक दल सक्रीय झाले, पथके रवाना करण्यात आली, तसेच बॉम्ब शोधक पथक, श्वान पथकही शाळांमध्ये दाखल झाले. आणि शाळांमधून शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र, सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. यावर पुढील कारवाई अजूनही सुरू आहे. शाळांमध्ये सुटीच्या दिवशी रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास scottielanza@gmail.com या मेल आयडीवरून मेल पाठविण्यात आले आहेत. मी शाळेच्या इमारतीमध्ये बरेच बॉम्ब ठेवलेले आहेत. बॉम्ब आकाराने लहान असून ते लपवण्यात आले आहेत. बॉम्ब फुटल्यानंतर इमारतींचं फारसं नुकसान होणार नाही पण मोठ्या संख्येने लोक जखमी होऊ शकतात, असं या मेलमध्ये म्हटलं आहे.
मला ३० हजार डॉलर द्या..
मला जर तुम्ही ३० हजार डॉलर दिले नाहीत, तर तुम्ही तुमचे हातपाय गमावून बसाल आणि दुःख सहन करत बसाल, अशी धमकी देण्यात आली आहे. या हल्ल्यामागे कोणता गट आहे, त्याचे नावही मेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
कोणत्या शाळांना आले मेल?
धमकीचे मेल मिळालेल्या शाळांमध्ये डीपीएस आरके पुरम, जीडी गोएंका पश्चिम विहार, द ब्रिटिश स्कूल चाणक्यपुरी, दर मदर्स इंटरनॅशनल, मॉर्न स्कूल मंडी हाऊस, डीपीएस वसंत कुंज, दिल्ली पोलिस पब्लिक स्कूल सफदरजंग, डीपीएस ईस्ट ऑफ कैलाश आणि सलवान पब्लिक स्कूल आदींचा समावेश आहे.
हे तर सरकारचे अपयश
शाळेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा मेल आल्याबद्दल सर्व शाळांनी पालकांना तातडीने एसएमएसद्वारे कळविले होते. त्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव पालकांनी मुलांना शाळेतून घरी न्यावे, अशी सूचना करण्यात आली होती. दिल्लीतील शाळांना एकाच वेळी अशा प्रकारचे धमकीचे मेल नियमित येणे, हे सरकारचे अपयश आहे अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
मे महिन्यातही आलेत धमकीचे मेल
मे महिन्यात सुद्धा सुमारे २०० पेक्षा अधिक शाळा, रुग्णालये आणि अन्य सरकारी आस्थापनांमध्ये अशा प्रकारच्या बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचे मेल पाठविण्यात आले होते. मात्र व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) या माध्यमातून ते पाठवले असल्याने त्या मागील सूत्रधार शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.
(संदर्भ – पीटीआय)