दिल्लीत 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत!

आम आदमी पार्टीला जोरदार धक्का
दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पार्टीला जोरदार धक्का देत विजय मिळवला. पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपने दिल्ली विधानसभेवर आपला झेंडा फडकावलाच. मात्र हा दणदणीत विजय मिळवताच आपचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांनाही पराभवाची धूळ चाखायला लावली. सध्या भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर आहेत. दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला असून तब्बल 27 वर्षांनी भाजप पुन्हा सत्तेत परतला आहे. भाजपने पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. दिल्लीच्या मतदानादिवशी गंगास्नान, भर निवडणुकीत 12 लाखांची करमुक्ती भाजपच्या यशास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. दिल्लीत आपची वाताहत झाली असून केजरीवाल स्वत: पराभूत झाल्याने पक्षाचा बुरूज कोसळला आहे. अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.
मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये 5 राज्यांमध्ये भाजप युतीचे सरकार
दुसरीकडे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विक्रमी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यावर्षी 8 राज्यांमध्ये निवडणूक लढवली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडचा समावेश आहे. यामध्ये आंध्र, अरुणाचल, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या 5 राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झाले. सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि एसकेएम यांच्यातील युती तुटली, तथापि, दोघेही केंद्रात एकत्र आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि झारखंडमध्ये जेएमएम यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सरकार आहे. दिल्लीतील भाजपच्या विजयाने देशातील 19 राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे मध्य भारत भाजप आणि एनडीएमधील मित्रपक्षांचे सरकार आहे.
भाजप युतीने 2018 मध्ये इंदिराजींच्या विक्रमाची बरोबरी केली
2018 मध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा विक्रम भाजप आघाडीच्या नावावर होता. मार्च 2018 मध्ये एनडीएने त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये सरकार स्थापन करून 21 राज्यांत पोहोचले. यासह एनडीएने इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेसच्या विक्रमाची बरोबरी केली. स्वतंत्र भारतात राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा केंद्रासह 21 राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती.