राज्यात २० नोव्हेंबरला एका टप्प्यात मतदान

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार असून राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. यात महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून २८८ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार असून यात ४ कोटी ६४ लाख महिला तर ४ कोटी ९७ लाख पुरुष मतदार आहेत. तसेच ६ लाख ३२ हजार दिव्यांग तर ८५ वर्षांवरील १२ लाख ८४ हजार मतदार आहेत. तसेच २० कोटी ९९ लाख लोक हे पहिल्यांदा मतदान करणार असून यात १ कोटी ८५ लाख तरुण मतदार आहेत, असे त्यांनी म्हटले.
२३ तारखेला तर मतमोजणी
निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र असणार असून शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. तसेच निवडणुकीचे नोटीफीकेशन २२ ऑक्टोबरला निघणार असून उमेदवारांना २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी ३० ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. त्यानंतर उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ व २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.
निवडणूक आयुक्त पुढे म्हणाले की, मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रांवर असेल. तर ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. तर सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल, असे राजीव कुमार यांनी म्हटले.
दरम्यान, २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. या निवडणुकीत जवळपास ६१.४ टक्के मतदान झाले होते. याचसोबत २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार असून त्याआधीच नवीन सरकार अस्तित्वात येणार आहे.