मुंबई – गोवा महामार्गावर एसटीचा अपघात

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे कोल्हापूरहून तुळजापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. बस सर्विस रोडवरून मुख्य रस्त्यावर येताना समोर उभ्या कंटेनरला बसची जोरदार धडक बसली.
बस चालक शंकर अशोक टक्के (वय ३५ वर्षे, रा. मालवण) हे मालवण एसटी बस डेपोची बस घेऊन जात असताना बसचे स्टेअरिंग फेल झाल्यामुळे त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने कंटेनरला धडक दिली. तेलगळती झाल्यामुळे हा कंटेनर रस्त्याच्या कडेला उभा होता. या एसटी बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास झाला आहे. मालवण आगाराची एसटी बस मालवण ते कोल्हापूर-तुळजापूर मार्गावर निघाली होती. ही बस कसाल आगारातून कोल्हापूर-तुळजापूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास २६ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवासाना ओरोस जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.