राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप : वाल्मिक कराड

खंडणीचा खोटा गुन्हा दाखल
मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोप असलेला वाल्मिक कराड हा आज २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. मात्र, शरण येण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करत स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे त्याने म्हटले. तसेच आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावाही त्याने केला.
सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. त्यानंतर वाल्मिक कराड यांची खंडणी प्रकरणात सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येत आहे.तसेच हे प्रकरण विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील गाजले. त्यानंतर बीड आणि परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकरांनी हत्या प्रकरणातील प्रमुख सूत्रधाराला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनाही आक्रमक भूमिका घेत याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला. यानंतर सीआयडीने वाल्मिक कराडच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली. मात्र, वाल्मिक कराड पथकांच्या हाती न लागता स्व:ताहून पोलिसांना शरण आला.
त्याआधी त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडीओत तो म्हणाला होता की, “मी वाल्मिक कराड माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे,” असे त्याने म्हटले होते.