`लग्नाची बेडी` दूरच.. हाती पोलिसांच्या बेड्या

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
लाहोर : फेसबुकवर मैत्री झालेल्या महिलेशी विवाह करण्यासाठी भारतातून एक तरूणानं पाकिस्तानची सीमा अवैधरित्या ओलांडली पण लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांच्या बेड्याच त्याच्या हातात पडल्या.
ही गोष्ट आहे उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या एका तरूणाची फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते आणि विवाहाची वचने देऊन सीमापार जाणाऱ्या अनेक कथा भारत – पाकिस्तान या दोन देशांदरम्यान घडल्या आहेत. सोशल मीडियाचा प्रमाणाबाहेर वापर वाढल्यापासून असे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा प्रकरणांमध्ये अवैधरित्या सीमा ओलांडून जाण्याच्या घटनाही घडतात. या घटनेतही तसेच झाले आहे.
उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या बादल बाबू (वय २०) याला अशाच प्रकरणी २८ डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंडी बहाउद्दीन जिल्ह्यात अटक झाली होती. लाहोर येथून साधारण २४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. बादल बाबू याची एका महिलेशी फेसबुकवरून ओळख झाली होती. ती पाकिस्तानात राहणारी महिला आहे. मैत्री झाल्यानंतर तिच्याशी विवाह करण्याच्या उद्देशाने बादल हा पाकिस्तानची सीमा अवैधरित्या ओलांडून गेला. मात्र, लग्नाच्या बेडीत अडकण्याची स्वप्ने घेऊन गेलेल्या बादल बाबू याच्या हाती मात्र पाकिस्तान पोलिसांच्या बेड्या पडल्या आहेत. कारण, पाकिस्तानात गेल्यानंतर संबंधित महिलेने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान पोलिसांनी बादल याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. बादल हा शिंपीकाम करतो. त्याला आणखी दोन भाऊ आहेत. बादल हा सध्या दिल्लीत राहात होता. ३० नोव्हेंबर रोजी त्याचे त्याचे वडिलांशी व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण झाले होते. ज्या कामासाठी आलो होतो, ते काम झाले आहे, असे त्याने वडिलांना सांगितले. पाकिस्तानात जाताना स्वतःजवळची सगळी ओळखपत्रं, कागदपत्रं त्याने दिल्लीतील राहत्या घरीच ठेवली होती. कारण, पाकिस्तानात चौकशी दरम्यान त्याला कोणतीही ओळखपत्रं सादर करता आली नाहीत.
(संदर्भ – पीटीआय)