राष्ट्रवादी गटांमधील कोणत्या लक्षणीय लढती?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यात अनेक राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर करून अन्य पक्षात सामील होणे किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करण्यासारख्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर मूळ पक्षातील नेते आणि तो सोडून बाहेर पडलेले नेते असे काही ठिकाणी उमेदवार आमनेसामने येणार आहेत.
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगवेगळे झाले. त्यानंतर राज्यात २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली. अजित पवार यांनी २०१९ मध्ये निवडून आलेल्या आमदारांपैकी त्यांच्या पाठीशी असलेले ४१ आमदार घेऊन ते शरद पवारांपासून वेगळे झाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले. मात्र, त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांच्याच पक्षाने बाजी मारली. पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षात ३५ मतदारसंघांत थेट लढत होणार आहे.
जागावाटपात केवळ १३ आमदार हाताशी असूनही शरद पवार यांनी एकूण ८७ उमेदवार निवडणुकीत उभे केले आहेत. यात भाजप तसेच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या नेत्यांचीही संख्या आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या पाठीशी ४१ आमदार असूनही त्यांना फक्त ५२ जागाच मिळवता आल्या. विधानसभा निवडणुकीत पवार यांनी महाविकास आघाडीतून ८७ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या तर अजित पवार यांच्या पक्षाला ५२ जागाच मिळाल्या आहेत. यातील एकूण ३५ जागांवर दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.
लक्षणीय लढती कोणत्या?
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट यांच्यामध्ये बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार, इंदापूरमध्ये दत्ता भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील, कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे, कळवा-मुंब्रामध्ये नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांसारख्या लक्षणीय लढती होणार आहेत.