बांग्लादेशातून भारतीय मायदेशी येण्यास प्रारंभ

नवी दिल्ली : भारताचा शेजारी बांगलादेशातील परिस्थिती दररोज आणखी कठी होत आहे. शेख हसीना यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देश सोडल्यानंतर त्या सध्या भारतात वास्तव्यास आहेत. दिल्लीतील अज्ञातस्थळी त्यांचा मुक्काम आहे. दुसरीकडे बांगलादेशात अजूनही आंदोलक तीव्र झाले आहेत आणि परिस्थिती हाताबाहेर जात आहे. त्यांच्याकडून ठिकठिकाणी तोडफोड सुरुच आहे. आता अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजाला लक्ष्य केलं जात आहे.
बांगलादेशात आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरुन विद्यार्थी आक्रमक झाले असून देशभरातील परिस्थिती चिघळत चालली आहे. त्यामुळे देशात अभूतपूर्व संकट निर्माण झालं आहे. आधी आरक्षणविरोधी असलेला लढा नंतर सरकारविरोधी झाला. त्यामुळे परिस्थिती शेख हसीना यांच्या हाताबाहेर गेली. त्यामुळे त्यांनी सोमवारी देश सोडला. सध्या ते भारतात आश्रयाला आहेत.
बांग्लादेशातल्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता भारताकडून एअर इंडियानं पावलं उचलली आहेत. सध्या ढाका ते दिल्ली दरम्यान स्पेशल चार्टर्ड प्लेन सुरु करण्यात आलं आहे. बांगलादेशात एकूण १९ हजार भारतीय नागरिक असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संसदेत दिली आहे. बांगलादेशात १९ हजार भारतीय नागरिक अडकले असून त्यातील ९ हजार विद्यार्थी आहेत. एअर इंडियाच्या विमानानं बुधवारी सकाळी बांगलादेशची राजधानी ढाक्याहून नवी दिल्लीला उड्डाण केलं. यात सहा लहान मुलांसह २०५ जणांचा समावेश आहे. ए३२१ नियो विमानातून भारतीय नागरिक मायदेशी परतले. ढाक्याच्या विमानतळावर अतिशय मूलभूत अडचणी असताना सगळ्या आव्हानांवर मात करत एअर इंडियानं विशेष विमान सेवा सुरु ठेवली आणि भारतीयांची सुटका केली.
आजपासून एअर इंडियाच्या दिल्ली ते ढाका अशा दोन फेऱ्या दिवसाकाठी होतील. विस्तारा आणि इंडिगो यांच्याही विमानांची उड्डाणं वेळानुसार होतील. दोन्ही कंपन्यांची ढाक्यापर्यंतची विमानसेवा सुरु राहील. बांगलादेशातील परिस्थिती पाहता दोन्ही कंपन्यांनी मंगळवारी त्यांची ढाक्याला जाणारी विमान रद्द केली होती.