२९ अनधिकृत बंगले जमीन दोस्त करण्याचा निर्णय कायम

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात अनधिकृतपणे बंगले उभारण्यात आले आहेत. नदीमध्ये उभारण्यात आलेले हे २९ अनधिकृत बंगले जमीन दोस्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. यामुळे हे बंगले पाडण्याबाबत महापालिकेकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या चिखली येथील इंद्रायणी नदीच्या पात्राजवळील ब्लू लाईनमध्ये जरे वर्ल्ड बिल्डर या विकासकाने नागरिकांना ओपन बंगलो प्लॉट विक्री केले होते. या ओपन बंगलो प्लॉटमध्ये नागरिकांनी पाटबंधारे विभागाचे, पर्यावरण विभागाचे आणि महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत २९ बंगले उभारले होते. या बेकायदेशीर बांधकाम विरोधात पर्यावरण प्रेमी वकील तानाजी गंभीरे हे राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. त्यानंतर राष्ट्रीय हरित लवादाने हे २९ बंगले जमीनदोस्त करून बंगल्यांचा राडारोडा साफ करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा दंड विकसकाला ठोठावला होता.
या निर्णयाच्या विरोधात विकसक आणि बंगलो प्लॉट धारक हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने विकसकाला आणि बंगलो प्लॉट धारकाला फटकारत राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे चिखली येथील इंद्रायणी नदी पात्रा जवळील ब्लू लाईनमध्ये उभारण्यात आलेले २९ बंगले आता जमीन दोस्त करण्यावर आता शिक्का मोर्तब झाले आहे.