पुणे जिल्ह्यातल्या धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढला

पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात आता वाढ झाली आहे. आज अखेर एकूण ४७.८६ टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळं धरणांमधला पाणीसाठा आता २४.१३ टक्के इतका झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा आजपर्यंतचा पाणीसाठा हा ३.७७ टीमसीने अधिक आहे.
पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. त्यापैकी सहा धरणे टाटा समूहाची धरणे आहेत. ती वगळता उर्वरित २६ धरणांमध्ये म्हणजे उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, वीर आदी प्रमुख धरणांचा यात समावेश होतो. पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर मात्र पावसात खंड पडल्याने धरणातील पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस सुरू झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होऊ लागली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.