इंद्रायणी नदी पूर ; श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी मध्ये न येण्याचे आवाहन!

पिंपरी : पिंपरी चिंचवड- पुणे सह मुसळधार पाऊस कोसळत असून या प्रचंड पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नदीला पूर आला आहे. राज्यभरातून संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा महाराज पालखी सोहळ्यासाठी आळंदीत वारकरी मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असल्याने सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला वारकऱ्यानी आळंदी मध्ये येऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंदिर प्रशासनाने केले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वारकरी भाविक आणि नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत .त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. अनेक धर्मशाळांमध्ये आणि सखलभागात पाणी शिरले आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांनी आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबावे असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदी मधून सुरुवात होणार असली तरी राज्यभरातील वारकऱ्यांनी आळंदीला न येता पुणे शहरांमध्ये येऊन वारीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
नागरिकांनी प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच नदीपात्र घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
आळंदीत बचाव कार्य यशस्वी
संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या केंद्रे महाराज मठ भक्त निवास इमारतीमध्ये पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या सर्व नागरिकांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस दलातील २० पोलीस अंमलदार आणि ४ अन्य नागरिक (एकूण २४ जण) आज सकाळी ६:०० वाजेपासून आळंदी येथील भक्त निवास इमारतीत अडकले होते. मुसळधार पावसामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले होते, वीजपुरवठा खंडित झाला होता आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या घटनेबाबतचा अत्यंत महत्त्वाचा संदेश प्राप्त होताच, पीएमआरडीए आपत्कालीन व्यवस्थापन (पीडीआरएफ) आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर बचाव मोहीम हाती घेतली. आपत्कालीन पथकाने अत्यंत कौशल्याने पूरपरिस्थितीवर मात करत सर्व २० पोलीस कर्मचाऱ्यांना आणि इतर ४ जणांना भक्त निवास इमारतीमधून सुखरूप बाहेर काढले आहे. सर्व नागरिक सुरक्षित आहेत.

