अमेडिया कंपनीचा जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी भरावे लागणार!

आयटी पार्कचे कारण निरस्त झाले
पुणे : शहरातील कोंढवा येथील तब्बल 40 एकर जागा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुलाच्या कंपनीने खरेदी केली आहे .हा खरेदी व्यवहार रद्द करण्यासाठी व्यवहारातील कंपनीशी संबंधित असलेल्या शितल तेजवानी स्वतः निबंध कार्यालयात हजर राहत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही .याशिवाय व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी ऐवजी दुप्पट म्हणजे 42 कोटी रुपये भरावे लागतील अशी माहिती पुढे आली आहे .

कोंढवा येथील 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने तीनशे कोटी रुपयांना खरेदी केली आहे .अनियमित व्यवहार करून केवळ पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी खत करण्यात आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे .या जागेवर आयटी पार्क होईल असे सांगण्यात आले होते, मात्र ते कारण निरस्त झाले आहे .त्यामुळे त्या व्यवहाराचे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवहार रद्द करण्यासाठी देखील पूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागेल ते देखील 21 कोटींचे असेल .त्यामुळे संबंधित जमिनीचा व्यवहार रद्द करताना एकूण नियमानुसार दुप्पट 42 कोटी रुपये भरावे लागतील अशी माहिती निबंधक संतोष हिंगणे यांनी दिली आहे.
पहिल्या व्यवहाराचे 21 कोटी रुपये अमेडिया कंपनीकडून वसूल करण्याची नोटीस आहे ,तर व्यवहार रद्द करण्यासाठीचे 21 कोटी रुपये कोणी भरायचे हे अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांनी ठरवायचे आहे. जर पैसे भरले नाहीत तर सक्तीने वसुली करण्याची कायद्यात तरतूद आहे .या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याचा त्यांना अधिकार आहे .मात्र व्यवहार रद्द करण्यासाठी शितल तेजवानी यांनी सहनिबंधक कार्यालयात हजर असणेही आवश्यक आहे असेही हिंगणे यांनी सांगितले.
अमेडीया कंपनीत पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे ,तर दिग्विजय पाटील यांची केवळ एक टक्का मालकी असल्याचे समोर आले आहे .एक टक्का मालकी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित होत आहे .याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना प्रसिद्धी माध्यमाने विचारले असता ,महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच याचे उत्तर देऊ शकतील मी देऊ शकत नाही असे म्हटले आहे .सरकारमधील ज्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात या व्यवहारासाठी मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे .सरकार कुणालाही वाचवणार नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले .या गुन्ह्याचा तपास सुरू असताना अन्य कोणाचा सहभाग आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे असे सांगण्यात येत आहे .

